Skip to main content

प्रासंगिक 11 : आयुष्य गंडलंय

आयुष्य गंडल्याची प्राथमिक लक्षणं कोणती? एक म्हणजे नुसता आयुष्यात नुसता धिंगाणा होणे. सगळं अस्ताव्यस्त , भविष्याचं काय घेऊन बसला वर्तमानाचा सुद्धा भरवसा नसणे.
नुसत्या अडचणी . पण त्या सोडवत जगणं म्हणजे मजाच ना !
ऐन निघायच्या वेळी गाडीची चावी हरवणे , अंघोळीला बसल्यावर साबण संपल्याचे लक्षात येणे, अख्खा साबण लावल्यावर पाणी संपणे, अंघोळ झाल्यावर जी घालायची ती अंडरपॅन्ट गच्च भरलेल्या बादलीत पडून संपूर्ण भिजणे , भरवस्तीत मुलींच्या घोळक्यासमोर गाडी बंद पडणे , लग्नात नाचताना पॅन्ट फाटने , सबमिशनच्या अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला हाकलून देणे ही गंडल्याची काही लक्षणे !

अशा वेळी आयुष्यावर चिडून काय फायदा ? उलट याचा आनंद घेत जगलं तर ? आयुष्याची मजा खरी असं गंडण्यातच आहे. रस्ता चुकणे ही तर गंडल्याची सर्वात पक्की खुण. हरीचंद्रगडावर एकदा आमची वाट चुकली आणि भली मोठी गुहा बघायला मिळाली . तिथे वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा बघायला मिळाल्या. त्या वेळी वाटलेली भीती आणि धीरगंभीर शांततेत फुटलेला घाम म्हणजे साक्षात मृत्यूच. तरीही जिवंत मागे आलोच ना ! गंडल्याची ही मजा नाही घेतली तर आयुष्य बिनकामाचे वाटेल.

म्हणजे बघा ना माझ्या गाडीची चावी रोज हरवते. अर्थात याला आमचा निष्काळजीपणा नडतो पण हरवते राव चावी. मग वरच्या मजल्यावर तपासून झाल्यावर मी खाली येतो. ड्रॉवर, माळे, किचन, फ्रीज सगळं चेक करून झाल्यानंतर पुन्हा वरच्या मजल्यावर दोन खोल्या चेक करतो. आणि हे सगळे सुरू असते नऊ वाजता. अर्थात नऊ हा माझा ऑफिसचा टाईम. मग चावी गाडीलाच असल्याचा शोध मला लागतो आणि मी हेल्मेट विसरून ऑफिसला घाई घाईत जातो. पोलिसमामाला चुकवत गल्ली बॉय बनत मी ऑफिसला पोचतो. मग कळतं की डोक्याला तेल लावायचं राहीलं. अर्थात आयुष्य गंडलंय राव!

एकदा तर हद्दच झाली . मी पाईपलाईन रोडवरून पुणे स्टँडला गेलो. रिक्षावाल्याला पैसे द्यायला पाकीट काढलं. कशाचं काय ? पाकिटात फक्त 5 रुपये!!! बापरे! पैसे गेले कुठे? आत्ताच तर काकांनी 200 दिले होते. रडकुंडीला आलेला चेहरा घेऊन मी रिक्षावाल्याला म्हणालो.
"सर, माझ्या पाकिटात पैसेच नाहीयेत ओ..."
तो रागात म्हणाला "चला मी तुम्हाला पुन्हा पाईपलाईनला घेऊन जातो. मग मला पैसे द्या."
मग रडवेला मी आणि तो रिक्षावाला पुन्हा सिट भरत भरत निघालो. दिल्लीगेट पर्यंत रिक्षा आल्यावर माझ्याच पाकिटात मला दोनशे रुपये सापडले!!! म्हणजे माझ्याच पाकिटात असलेले पैसे मला वेळेवर का नाही सापडले ? याचं एकच उत्तर म्हणजे आयुष्य गंडलंय !! या गंडलेल्या आयुष्याच्या रागात पुन्हा दिल्लीगेट ते पुणे स्टँड पर्यंत पायीपायी गेलो. मोक्कार पाय दुखले.

थोडक्यात आयुष्य माझं एकट्याचंच गंडलंय की अजून कोणी आहेत याचा शोध घेतला तेव्हा जवळजवळ बरेच गंडलेले आढळून आले. म्हणजे कोणी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं , कोणी बारावीनंतर डिप्लोमा केला आणि तोही मेकॅनिकल , कोणी वावरभर कांदे लावले , कोणी डी एड ला ऍडमिशन घेतलं , असो. प्रत्येक जण गंडतो राव कुठेतरी . पण हे गंडलेलं खुल्या दिलाने स्वीकारून हसत पुढे गेलं तर आयुष्य तुमचं स्वागतच करेन.

आयुष्याशी लपाछपी खेळत गंडत चुकत भरकटत जगण्यात वेगळी मजा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाकडे बघून फक्त म्हणायचं "च्यायला आयुष्य गंडलंय राव !" आणि बिनधास्त पुढे निघायचं....

- अजिंक्य





Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 12 : जवारी आळाशे पाचूंदा वळ्हई आणि बरंच काही ...

आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं . नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत . असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते . एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नस...