हे सुई प्रकरण दिवसभर माझ्या डोक्यात असायचं . त्यात मी पाठीवर पिशवी घेऊन सायकलवर शाळेत जायचो . त्यात पॅडल मारताना अक्षरशः माझा गुडगा वाकत नव्हता . गुडग्यावरचं बेंड आता मोक्कार मोठं झालं होतं . वरती भली मोठी तेव्हाच्या दोन रुपयाएवढी खपली आणि त्याखाली पिवळा पु झालेला!! अगदी गच्च भरलेली ती जखम . एवढी जबर दुखायची कि तेवढ्या वेदना मी आजवर कधीही सहन केल्या नाहीत . तरीही एक इंजेक्शन मी कधीही घेतलं नाही . ती जखम आणि त्यामुळे बारीक कणकण आलेली . रोज आपलं लंघडत लंघडत चालायचं , त्या दुखाला पाणी लागू न देता अंघोळ करायची आणि थंडी असल्यामुळे सकाळ सकाळी चुलीसमोर बसून शेकत बसायचं . मग भाकरी खाता खाता त्यावरची पट्टी बळ बळं सोडायची . झालेल्या पुमुळं आणि रक्तामुळे ती वरची धोतराची पट्टी त्याला चिकटायची . ती ओढून काढायची म्हणजे मरणप्राय वेदना व्हायच्या . तरीही इंजेक्षनपुढे सगळ्या वेदना फिक्क्याच !!
अख्खा गुडगा आता सडणार कि काय अशी भीत वाटायला लागली . बाबा शाळेसमोर येऊन मला पकडायचा प्रयत्न करायचे आपण मी बरोबर चुकवून थेट मळ्यात यायचो. सायकल लावून भटकायचो रानात . अगदी अंधार पडला कि करंजुले डॉक्टरचा दवाखाना बंद होतो हे मी आधीच पाहून ठेवलं होतं . मग हा दवाखाना बंद होईपर्यंत मी असाच रानात भटकायचो. आई रानात घास कापत असायची संध्याकाळच्या वेळी . मग तिच्या पदराशी खेळायचं , थोडीफार मदत करायची आणि मग अंधार पडला कि घरी यायचं आणि मग कोणी मला दवाखान्यात नेत नव्हतं . असे तीन महिने काढले मी !
मला पकडून कोणीही दवाखान्यात नेउ शकलं नव्हतं . माझे नगरचे काका आले होते त्यांनी लै समजावून सांगितलं पण काही जमलं नाही .
शेवटी एक दिवस ठरला त्या दिवशी मला शाळा सुटल्यानंतर गावातल्या घरी बोलावण्यात आलं . काहीतरी कार्यक्रम होता घरी त्यामुळे मी पुरणपोळ्या खाल्ल्या आणि मला तिथूनच उचलून नेण्याचा प्लॅन झाला होता . पुराणपोळीमुळे भवरा इथे फसला आणि चला घरी असं म्हणून एम ८० वरून मी निघालो रानाकडे . पण आळीमध्ये गाडी थांबवली बाबांनी आणि भगताचा भानाप्पा मागे बसला . तेव्हाच मी ओळखून घेतलं कि आता आपला कार्यक्रम होणार!! मी जे धिंगाणा चालू केला काय सांगता . पण भानाप्पा लै ताकदीचा गडी होता . मिलिटरी भरतीचा सराव करत असल्यामुळे चांगला निबर गडी आणि त्यात मी जखमी शेर!! आखिर शेर लाथा मारत बुक्क्या मारत नेला थेट करंजुले डॉक्टरकडे आणि डॉक्टरने देखिल घाई घाई सुई काढली आणि माझ्या मागून घातली . मी मोठ्याने ओरडत होतो . लाथा मारत होतो पण काही उपेग झाला नाही . डॉक्टर , भानाप्पा आणि बाबांनी भरपूर लाथा खाल्ल्या पण मला इंजेक्शन टोचलंच आणि त्यानंतर ते दुखणं बरं झालं . आजही गुढग्यावर भाला मोठा काळ डाग तसाच आहे . त्या काळाची एक आठवण .
त्यांनतर बऱ्याचदा आजारी पडलो पण मी कधी मागून इंजेक्शन घेतलं नाही . गोळ्यांवरच काम भागवलं. एकदा सलाईन लावायची वेळ आली होती पण मागून सुई घालायची वेळ आली नाही त्यानंतर !! हे सुई पराक्रम आयुष्यभर आपला पिच्छा करत असतं सालं ! आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा तर बाप्पा गुरासारखं टोचलं रे मला ! समोर क्रश बसलेलं आणि मी मोठ्या ऐटीत गेलो ना रक्तदानाला . लै टोचलं रे आणि रक्तदान केल्यावर उठताच येईना भाऊंना २ तास !! त्यांनतर व्हल्गडत व्हल्गडत घरी आलो. तेव्हापासून मी अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको या संघटनेत सक्रिय झालो !
- ajinkya dandawate
Comments
Post a Comment