आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं .
नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत .
असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते .
एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नसते तेव्हा त्या गाभुळ्या ज्वारीला हुरडा म्हणतात . हा हुरडा भाजून खाणे हा एक सोहळा असतो . त्यासाठी साधारण संध्याकाळची वेळ निवडली जाते . थंडी असल्यामुळे शेकणे हा एक उद्देश हुरडा खाण्यामध्ये पूर्ण होतो . काही निवडक कणसं निवडून आणली जातात . कणसे मोडण्यासाठी पण विशिष्ट कला लागते नाहीतर अख्खं ताट उपटून येतं पण कणीस तुटत नाही .
मग एक जण खांडं (शेणाच्या गोवऱ्या पण आपोआप तयार झालेल्या ) गोळा करतो . जरासा खड्डा करून त्यात खांडं टाकली जातात . ही खांडं पेटवली की त्याला 'झगरं' म्हणतात . या झगऱ्याची ऊब म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच !
मग या झगऱ्यात कणसं भाजली जातात . हातावर किंवा दगडावर चोळून त्यातले ज्वारीचे गरमागरम दाणे बाहेर काढले जातात . त्यातले भोंडे बाजूला काढले की हा हुरडा बिनधास्त खायचा . याची चव जो घेईल तो खरा भाग्यवान . असो हुरडा हे निमित्त असते पण या बैठकीत खाद्यसंस्कृतीचे , साहित्याचे , संस्कारांचे , परंपरांचे आदानप्रदान होते .
त्यानंतर ज्वारी काढून झाली की ज्वारीच्या पेंढ्या बांधल्या जातात . पण काढतानाच ज्वारीची ताटं एका पेंढीला लागतील एवढी एका ठिकाणी ठेवतात . त्याला आळाशे म्हणतात . अशे आळाशे पुन्हा ज्वारीच्याच ताटांनी बांधले जातात आणि पेंढी तयार होते . ते आळाशे बांधण्याची कला देखील फार सुंदर असते . दिसताना अगदी सोप्पी वाटते पण करता येत नाही . त्यानंतर आळाशाच्या पेंढ्या बांधून झाल्यानंतर पाच पेंड्या एका ठिकाणी ठेवल्या जातात त्याला पाचुंदा असे म्हणतात.
सगळी ज्वारी काढून बांधून झाल्यानंतर हे पाचुंदे गाडीत घालून खळ्याच्या ठिकाणी आणली जातात . जर जास्त दिवस पेंढ्या पडून राहिल्या असतील तर त्याखाली विंचू काटा असण्याची दाट शक्यता असते .आता इथे आपल्याला ज्वारीची कणसे आणि वैरण वेगळी करावी लागते त्याला कणसं खुडणे असे म्हणतात . कणसं न खुडलेल्या पेंढ्या उभ्या करून ठेवल्या जातात त्याला सुडी म्हणतात . नंतर त्या अतिशय कलात्मक पद्धतीने इष्टीकाचीतीच्या आकारात रचल्या जातात त्याला वळ्हई म्हणतात .वळई रचण्यासाठी अतिशय हुशार अनुभवी माणसं लागतात किंबहुना संपूर्ण शेती करण्यासाठीच लागतात . खळ्यात खुडलेली कणसं पुढे मशीनमधून मळून काढले जातात . मशीनमधून जो कचरा बाहेर पडतो त्याला बनग्या म्हणतात . ज्वारीच्या जर जास्त कचरा आला तर फार 'कुडी' आली असं म्हणतात . फोलपटासह दाणे आले तर त्यांना भोंडे म्हणतात .
असो या माहितीपर लेखात आपण ज्वारीच्या दाण्यापासून दाण्यापर्यंतचा प्रवास पाहिला .यापुढचा प्रवास अजून एका रंजक लेखात बघू .धन्यवाद !
खूप छान
ReplyDelete