Skip to main content

प्रासंगिक 10 : युद्ध 'पबजी'इतकं सोप्पं आहे का ?

पुलावामा हल्ला झाल्यानंतर देश शोकसागरात बुडाला हे विधान झळकले. पण यानंतर देशाच्या हाताला खूप मोठे काम मिळाले . अगदी खूप काही रोजगार मिळाल्यासारखे सगळे त्वेषाने कामाला लागले . व्हाट्सअप्प विद्यापीठ बहरले. ट्विटर तरारले, फेसबुक उजळले आणि सर्वांनी अकलेचे तारे तोडण्याची मोहीम सुरू केली .श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बाथ टबमध्ये गारव्याला निवांत बसलेली मंडळी अचानक या नव्या रोजगाराच्या संधीचा लाभ उठवण्यासाठी सज्ज झाली . त्यांनी शब्दांचीच शस्त्रे काढली. चांगली परजून घेतली आणि अकलेच्या ताऱ्यांच्या दिशेने सर्वांचा प्रवास सुरु  .

धीरोदात्तपणे सीमेवर लढणारे जवान शहीद झाले होते , ती कुटुंबे अश्रूंच्या सागरात बुडालेली असताना हातात मेणबत्त्या आणि प्रत्येकाच्या संस्थेचे बॅनर पुढे करून टोळके च्या टोळके पुढे आले . बऱ्याच जणांनी टीव्ही , पेपर आणि व्हाट्सअप्प विद्यापीठाची डिग्री बरोबर आणली असल्याने भाषणे केली . मेणबत्त्या विझून गेल्या पण हातात संघटनेचे बॅनर मात्र तसेच राहिले .बॅनर आणि अध्यक्ष टीव्हीवर दिसण्यासाठी पेड करू लागले .

टबमधून उठलेले सगळे थेट हातात मिठाच्या पुड्या घेऊन सैनिकांच्या घरी गेले .उपस्थित सर्वांच्या जखमांवर मिठाचे शिंतोडे उडवून त्यांनी सगळा माहोल टीव्हीवर आणला . दुसऱ्याच्या दुखाचं झगमगीत दर्शन साऱ्या जगाला घडवल्यानंतर त्यांच्या असुरी आत्म्याला कसली शांती मिळाली कुणास ठाऊक ? असो टबमधून युद्धभूमीवर आलेल्या लोकांनी युद्धभूमीवर देखील दावा सांगायला सुरुवात केली . आम्ही युद्धभूमीवर एकमेव आहोत यात नेमका आनंद कसला तेच मला कळत नाही .

युद्ध म्हणजे केवळ रक्तपात घडवते आणि नव्या प्रश्नांची भर घालते हा अनुभव असतानाही युद्ध का हवे असते तेच कळत नाही . सैनिकांचे आयुष्य पबजी गेम इतके सोप्पे आहे का ?? पुलावामा हल्ला जैश ए महम्मद या संघटनेने घडवला . या आणि अशा अनेक अतिरेकी संघटनांना पाक सहकार्य करते हे जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी संघटनांविरोधात भारताने कारवाई करावी अशी कोणाचीच इच्छा नसते! सर्वांना पाकविरुद्ध युद्ध हवे आहे .



भारतात सोशल मीडियावर आणि युद्धज्वर पसरला . युद्ध सुरू झालेले नसताना चॅनेलवाल्यांनी वॉर रम सुरू केल्या आणि उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ही म्हण सार्थ ठरवली. मग सगळी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली जनता युद्धाची स्वप्नं पाहू लागली . युद्ध म्हणजे पबजी आहे का ? ती क्रिकेटची मॅच वाटते का ?

बरं आता पुलावामा हल्ला झाल्यानंतर सगळ्या वाहिन्यांवर शहीद झालेल्या जवानांचा आकडा सारखा नव्हता . योग्य आणि नेमका आकडा हाती आला नसेल तर तो का प्रसारित करावा ? शहिदांची निष्प्राण कलेवरं हा काय खेळ आहे का ? कमी जास्त करता येईल असा वस्तूंचा बाजार आहे का ?

लगेच टबमध्ये झोपलेले जागे झाले आणि पोचले पुलावामामध्ये. तिथे कोणालाही प्रवेश नाही हे येड्याला पण कळते . मग तिथे जाऊन एखाद्या रस्त्यावरून हे टबवाले लाईव्ह रिपोर्टिंगची आपली हौस भागवून घेतात .बसल्या बसल्या रचलेल्या कथा टीव्हीवर सांगतात . हा सगळा खेळ सुरू असतो . तोपर्यंत इकडे  स्टुडिओला वॉर रूमचा रंग देऊन झालेला असतो आणि कोणीतरी निवृत्त लश्करी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना प्रश्न विचारणे सुरू असते .

भोळी भाबडी जनता हे बघत राहते . व्हाट्सअप्प विद्यापीठात नवे व्हिडीओ , फोटो , जोक व्हायरल होत राहतात . निर्बुद्ध आणि बधिर मेंदूतून प्रसवलेल्या अनेक गोष्टी लोक डोक्यावर स्टेटस म्हणून घेतात . स्वतःची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी उतावळ्या झालेल्या झुंडीत मुंढी खाली घालून सामील होतात !

भावना भडकवणाऱ्या पोष्टी , जोक , रक्तपाताचे जसेच्या तसे फोटो व्हिडीओ पोचतात . पण संवेदना हरवलेला निर्बुद्ध समाज हे सगळं पाहतो . स्वतःच्या भावना विकून ही झुंड मानवतेच्या उरावर बसायला निघाली आहे !

लष्करी हल्ल्यांची आणि नियोजनाची माहिती गोपनीय असते . ती सहजासहजी कोणाला मिळत नाही . कदाचित टबवाल्यांचे इथेच फावते . मग भारत पाक तुलना सुरू होते. यांच्याकडे इतके अणुबॉम्ब तर यांच्याकडे इतके रणगाडे . भारताची ताकद इतकी आणि पाकिस्तानची इतकी. मुळात यासंदर्भात कुठलाही ठोस आकडा लष्करातील प्रमुख लोक सोडून कुणालाच माहीत नसतो . अगदी लष्करात सेवेत असलेल्या जवानांना देखील नाही ! मुळात समाज बालिश असल्याने अनेकांचे फावले आहे .

आता बालकोटमधून बीबीसी ने रिपोर्ट दिला . तिथे जंगलात मुख्य वस्तीपासून दूर काही बॉम्ब पडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत . भारत जवळपास 350 दहशतवादी मारल्याचे सांगत आहे आणि पाकिस्तान असा हल्ला झालाच नाही असा कांगावा करतो  . अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ शांत राहून आपण देशभक्ती निभावू शकतो .

हे अनेकांचे धंदा करण्याचे दिवस आहेत. यामध्ये राजकीय पोळ्या , टबवाल्यांच्या पुरणपोळ्या भाजल्या जाणार आहेत . त्यात निवडणुका जवळ आल्याने अजून रंग देण्याचे काम होईल . याकडेही जागरूक नागरिक म्हणून नजर असायला हवी. पण नागरिक जागरूक नाही हे अवघड जागेचे दुखणे सांगणार कोणाला ?

गेमचे किंवा युद्धासरावाचे व्हिडीओ व्हायरल झाले . 'काश्मीर तो होगा लेकीन पाकिस्तान नही होगा' अशा कविता व्हायरल झाल्या आणि अख्ख्या भारताला युद्धाचा ताप चढला . तिकडे पाकिस्तानात काही वेगळी परिस्थिती आहे असे नाही . तिकडे सेम कंडिशन आहे . निर्बुद्ध आणि संवेदना हरवलेल्या समाजामुळे शहाण्या माणसांची गळचेपी होती . मग लेखकांची , कवींची मुस्कटदाबी होते . विचार स्वातंत्र्य सेना काढण्याची भाषा केली जाते पण अशी परिस्थिती याच चळवळीच्या अपयशामुळे निर्माण झाली आहे हे लक्षात घ्यावे .आता अशा परिस्थितीत एखादी वेगळी सेना काढण्यापेक्षा आहे त्या लोकांमध्ये संवेदनांचा ओलावा निर्माण करावा लागेल.

-अजिंक्य


Comments

  1. छान खरी परिस्थिती मांडली आपण

    ReplyDelete
  2. खुप छान लेखन.......

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख....

    ReplyDelete
  4. आणखी एक अप्रतिम लेख...👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...