Skip to main content

प्रासंगिक 3


... तर शेतकऱ्यांसारखे  विद्यार्थी आत्महत्यांचे सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही !

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठ ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावर एक साधी नजर टाकली तरी सगळे वास्तव समोर येईल . नावाजलेले विद्यापीठ म्हणून पुणे विद्यापीठाची ख्याती आहे  . लांबून लांबून विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश मिळावा यासाठी कष्ट करतात.  पुण्यामध्ये आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अक्षरशः जीव ओततात  पण इथले वास्तव बुध्दीला मुंग्या आणणारे आहे . पुणे विद्यापीठात गोंधळ आहे ,चुकीच्या निर्णयांचे लोंढे आहेत . पैशाचा, वेळेचा अपव्यय आहे आणि अनेकांच्या आयुष्याशी सुरू असलेला खेळ आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल . पुणे विद्यापीठ म्हणून दर्जा ढासळला आहे . ढिसाळ कारभार , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा ढासळलेला दर्जा , कॉपी आणि परीक्षेतील गोंधळामुळे निर्माण झालेली बजबजपुरी हेच ईथले भयानक वास्तव आहे . 


पुणे विद्यापीठामध्ये चालणारे काम प्रचंड सावकाश आहे . ऑनलाईन व्यवहारांचा नुसता आव आणला आहे पण कामाची गती खूप कमी आहे . विद्यार्थ्याला पास की नापास हे सांगायला विद्यापीठ इतका वेळ लावते की विद्यार्थी हवालदिल होतो . शिष्यवृत्ती पेक्षाही विद्यापीठाचे काम धिम्या गतीने चालले आहे . 
आता आपण या संपूर्ण प्रक्रियेसाठी खर्चाच्या तपशिलाचा विचार करू . अभियांत्रिकीच्या एका सत्राच्या परीक्षेसाठी झेरॉक्स ,इंटरनेट असा  साधारण १००० रुपये इतका खर्च येतो . त्यासाठी बस ,पेट्रोल ,वेळ याचा विचार केला तर आपले डोळे गरगरायला होतील . आता समजा एक विषय सुटला नाही तर त्याला त्या विषयाच्या त्याच्या उत्तरपत्रिकेची प्रिंट मागवावी लागते . त्यासाठी खर्च येतो २०० रुपये . झेरॉक्स आणि इंटरनेट पकडून . या फोटो कॉपी साठी त्याला दीड ते दोन महिने वाट पाहावी लागते   . तोपर्यंत त्याला त्या विषयाची चिंता असते.  एकदा photocopy आली की त्यात त्याला मार्क वाढवून मिळण्याची आशा असते . तो पुन्हा रीचेकिंगसाठी अर्ज करतो . यावेळी खर्च येतो २५० रुपये . आता रीचेकिंगचा रिझल्ट यायला अवकाश असतो आणि दुसऱ्या परीक्षा आलेल्या असतात . गेलेल्या विषयाचा पेपर द्यायचा की नाही हा प्रश्न त्याला असतो . नवे अर्ज सुटतात पण जुना रिझल्ट येत नाही मग अर्ज भरायचा की नाही ? नाही भरला तर विषय सुटला नाही तर काय करायचं ? आणि भरला आणि विषय सुटला तर पैसे वाया जातील . धरलं तर चावतय आणि सोडलं की पळतय अशी काही स्थिती असते . मुळात विद्यार्थी भिकारी बनून स्कॉलरशिप ची  भिक मागत उभा असताना विद्यापीठाचे अर्ज भरण्यात त्याची हयात निघून जाते . बाकी अभ्यास वगैरे सगळ्या अंधश्रद्धा असतात असा डायलॉग मुलं आरामात मारतात .जर विषय सुटला तर पैसे परत मिळत नाहीत . पण विद्यार्थी दान म्हणून सोडून देतात . 
एका विद्यार्थ्याचे नमुना उदाहरण .
नाव देवकर हृषिकेश .वडील विजय देवकर शेती करतात.  आई क्लार्क आहे.  परिस्थिती बेताची . नेवस्यावरून नगरला शिक्षणासाठी राहतात . एका प्रसिध्द अभियांत्रिकी महाविद्यालयात ऋषिकेश प्रवेश घेतो . द्वितीय वर्षात प्रामाणिकपणे कॉलेजला येतो पण त्याचे विषय बॅक राहतात . तृतीय वर्षात जायला त्याचा पहिल्या वर्षाचा मॅथ १ हा सब्जेक्ट सुटला नाही . त्यासाठी त्याने रीचेकिंग चा अर्ज भरला होता . आणि विषय नक्की सुटेल असा विश्वास त्याला होता . रीचेकिंग चा रिझल्ट शेतकरी कर्जमाफी इतका लांबला . त्याने तृतीय वर्षाचे कॉलेज ६ महीने केले . त्याला प्रोविजनल एडमिशन असे म्हणतात . ( खर तर महाविद्यालयांसाठी फुकट पैसे वापरायला मिळण्याचे ते एक साधन असते . ) 
             हृषिकेश ,स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये द्वितीय वर्षात इअर डाऊन झालेला .विद्यापीठाच्या जुगारात भरडला जातोय . पहिल्या वर्षाचा मॅथ १ हा  सब्जेक्ट सुटेल आणि तू तृतीय वर्षाला जाशील असे महाविद्यालय सांगत राहिले . घरच्यांना अंधारात ठेऊन तो सहा महीने महाविद्यालयात येत राहिला . सहा महिने येण्याजण्याचा खर्च त्याने सहन केला . आणि अचानक एक दिवस रीचेकिंग चा रिझल्ट आला . त्यात त्याचा पहिल्या वर्षाचा विषय बॅक होता . तो तृतीय वर्षात जाऊ शकत नव्हता . महाविद्यालयाने आणि विद्यापीठाने त्याचा वापर करून घेतला होता . त्याच्या स्वप्नाशी खेळ खेळला होता . तो खचला . डळमळला . पण उपयोग नव्हता.  तो लढतो आहे . आभास करतो आहे . स्थापत्य अभियंता होण्याचे त्याचे स्वप्न आहे . आता २०१८ साली त्याने मॅथ ३ साठी पेपर दिला होता . पण परत मार्क कमी पडले . त्याला विश्वास होता की माझा विषय सुटेल  पण नाही सुटला .त्याचा पुन्हा मॅथ ३ रीचेकिंगला टाकला . रीचेकिंग ला टाकताना तारीख होती १४ मार्च २०१८ . 
           त्यानंतर तो विषय जर सुटला तर त्याला पेपर द्यावा लागणार नाही . पण तो अधांतरी राहिला . पेपर सुटला तर अभ्यास करून फायदा नाही आणि नाही सुटला तर अभ्यास करावा लागेल .जोपर्यंत रीचेकिंग चा रिझल्ट येत नाही तोवर तो संभ्रमात होता . ( विद्यापीठाने ठेवला होता ) .पण रीचेकिंगच्या रिझल्टच्या आधी एक्झाम फॉर्म सुटले . ते फॉर्म भरले तरच त्याला मॅथ ३ चा पेपर परत देता येईल .पण अजून त्याला माहीतच नाही की माझा मॅथ ३ सुटलाय की नाही . मग त्याने फॉर्म कोणत्या आधारावर भरायचा ?? 
          १२ एप्रिल ला विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अचानक रिझल्ट जाहीर झाला . त्यात ऋषिकेशचा विषय गेला होता . तो नापास झाला होता . आता त्याला तो पेपर परत द्यायचा होता . पण पेपर साठी अर्ज करण्याची तारीख संपली होती . लेट फी देऊन फॉर्म भरण्याची तारीख होती ७ एप्रिल २०१८ . जर विद्यार्थ्याला माहीतच नाही की मी पास आहे की नापास तर तो परीक्षा अर्ज कसा करू शकेल ? बोलायला गेलं तर इंटर्नल मार्क शिक्षकांच्या आणि महाविद्यालयाच्या हातात असतात . त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची कला इकडे छान शिकायला मिळते . 
         अशातच व्यवस्थापन कौशल्य,प्रोजेक्ट मॅनेजमेंट असे विषय शिकवले जातात . अशा वेळी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे विद्यापीठाने बघायला हवे .विद्यापीठाने आणि सरकारने विद्यार्थ्यांचे आणि शिक्षण क्षेत्राचे प्रश्न सोडवले नाही तर शेतकऱ्यांसारखे  विद्यार्थी आत्महत्यांचे सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही ...

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...