मैत्री दिनाच्या निमित्ताने ....
मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी, चंद्र चांदण्यांशी ,अनोळखी चेहऱ्यांशी ,पाऊल ठशांशी ,तृणपर्णावरल्या मोत्यांशी ,अंगाखांद्यावर यथेच्छ लोळू दिलेल्या बैल जोडीशी ,मैत्री असंख्य जणांशी....
मैत्री हळुवार हृदयाला भिडलेल्या व्यक्तित्वाशी ,सागराच्या लाटेशी, उधळलेल्या रस्त्याशी ,पिकलेल्या पानाशी अन सुकलेल्या गुलाबाशी ....मैत्री स्वतःशी ,मैत्री अद्वैताशी ,विज्ञानाशी ,गणिताशी...मैत्री ओंकाराशी ...मैत्री निर्मितीसत्वाशी ...
मैत्री हे खरंच अजब रसायन एकमेकांसाठी जगण्यात एकमेकांशिवाय काहीच नसतं . मैत्री कोणाशी देखील होऊ शकते. मैत्रीमध्ये कसलेही बंधन नसते . अगदी उजाड माळरानाशी देखील मैत्री होते . फ्रेंडशिप इज वन सोल इन टू बॉडीज असं म्हटलं जातं. खरं दोन जीवांमध्ये असलेल्या एका आत्म्याचं वास्तव्य म्हणजे मैत्री . यासाठी दोघांचे विचार सारखे असावेत असं नाही . फक्त एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी एकदा धडपड सुरू झाली की मैत्रीचं नातं फुलतं.
हल्ली मैत्रीची व्याख्या फार सीमित झाली आहे. दोन पोस्टर लावले किंवा दोन फोटो एडिट करून व्हिडिओ बनवला की मी किती छान मैत्री करतो हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. असे करताना आपण कार्यामुळे तरी पासून दूर तर जात नाही आहोत ना याकडे लक्ष द्यायला हवं.
मित्र चुकीचा वागत असला तरी त्यासाठी काहीही करायला तयार असणे अशी मैत्री आज-काल आपल्यासमोर मांडली जाते . अनेक चित्रपटांमधून देखील आपण अशी मैत्री बघतो . मित्र दुसऱ्या मुलींना त्रास देत असतो ,आपल्याबरोबरच इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असतो आणि अशावेळी मी त्याचा मित्र आहे म्हणून मी त्याला मदत करावी अशी भावना आजकालच्या तरुणांमध्ये रुजते आहे . मित्र चुकत असताना देखील त्याला सहकार्य करणे हा व्यवहार आहे. याला मैत्री हे नाव आपण देऊ शकत नाही. दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र मानले परंतु दुर्योधन चुकीचे वागत असतानाही कर्णाने त्याला मदत केली त्यावेळेस तो अधर्म होता आणि अधर्माचे राज्य टिकू शकत नाही. त्यामुळे आजच्या जमान्यात आपली मैत्री खरंच निस्वार्थ आहे का ?आपला मित्र बरोबर वागत आहे का? हे तपासून पाहणे नितांत गरजेचं आहे.
मैत्रीदिनाच्या निमित्ताने व्हाट्सएप्प आणि फेसबुकवर शुभेच्छांची लाट आली आहे . प्रत्येक जण एकमेकांना कॉपी-पेस्ट मेसेज पाठवण्यात दंग झालाय . काहीजण तर अगदी संकुचितपने सेम टू यू असे लिहून मोकळे होतात पण यामागे भावनांचा ओलावा दिसत नाही . यापेक्षा खरंच आपले कोणी मित्र असतील तर त्याच्यासोबत वेळ घालवा ,त्यांच्याशी फोनवर गप्पा मारा आपली सुख दुःखं वाटुन घ्या यातून आपण खरा मैत्रीदिन साजरा करू शकतो.
- अजिंक्य
Nice bhau👌👌
ReplyDeleteWah ! Mst
ReplyDeleteMust re...
ReplyDeleteMast ajinkya...
ReplyDeleteमस्त
ReplyDelete