Skip to main content

प्रासंगिक १


मैत्री दिनाच्या निमित्ताने ....

मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी, चंद्र चांदण्यांशी ,अनोळखी चेहऱ्यांशी ,पाऊल ठशांशी ,तृणपर्णावरल्या मोत्यांशी ,अंगाखांद्यावर यथेच्छ लोळू दिलेल्या बैल जोडीशी ,मैत्री असंख्य जणांशी....
मैत्री हळुवार हृदयाला भिडलेल्या व्यक्तित्वाशी ,सागराच्या लाटेशी, उधळलेल्या रस्त्याशी ,पिकलेल्या पानाशी अन सुकलेल्या गुलाबाशी ....मैत्री स्वतःशी ,मैत्री अद्वैताशी ,विज्ञानाशी ,गणिताशी...मैत्री ओंकाराशी ...मैत्री निर्मितीसत्वाशी ...



मैत्री हे खरंच अजब रसायन एकमेकांसाठी जगण्यात एकमेकांशिवाय काहीच नसतं . मैत्री कोणाशी देखील होऊ शकते. मैत्रीमध्ये कसलेही बंधन नसते . अगदी उजाड माळरानाशी देखील मैत्री होते . फ्रेंडशिप इज वन सोल इन टू बॉडीज असं म्हटलं जातं.  खरं दोन जीवांमध्ये असलेल्या एका आत्म्याचं वास्तव्य म्हणजे मैत्री . यासाठी दोघांचे विचार सारखे असावेत असं नाही . फक्त एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी एकदा धडपड सुरू झाली की मैत्रीचं नातं फुलतं.

हल्ली मैत्रीची व्याख्या फार सीमित झाली आहे.  दोन पोस्टर लावले किंवा दोन फोटो एडिट करून व्हिडिओ बनवला की मी किती छान मैत्री करतो हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. असे करताना आपण कार्यामुळे तरी पासून दूर तर जात नाही आहोत ना याकडे लक्ष द्यायला हवं.
         मित्र चुकीचा वागत असला तरी त्यासाठी काहीही करायला तयार असणे अशी मैत्री आज-काल आपल्यासमोर मांडली जाते . अनेक चित्रपटांमधून देखील आपण अशी मैत्री बघतो . मित्र दुसऱ्या मुलींना त्रास देत असतो ,आपल्याबरोबरच इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असतो आणि अशावेळी मी त्याचा मित्र आहे म्हणून मी त्याला मदत करावी अशी भावना आजकालच्या तरुणांमध्ये रुजते आहे .  मित्र चुकत असताना देखील त्याला सहकार्य करणे हा व्यवहार आहे.  याला मैत्री हे नाव आपण देऊ शकत नाही. दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र मानले परंतु दुर्योधन चुकीचे वागत असतानाही कर्णाने त्याला मदत केली त्यावेळेस तो अधर्म होता आणि अधर्माचे राज्य टिकू शकत नाही.  त्यामुळे आजच्या जमान्यात आपली मैत्री खरंच निस्वार्थ आहे का ?आपला मित्र बरोबर वागत आहे का? हे तपासून पाहणे नितांत गरजेचं आहे.
मैत्रीदिनाच्या निमित्ताने व्हाट्सएप्प आणि फेसबुकवर शुभेच्छांची लाट आली आहे   . प्रत्येक जण एकमेकांना कॉपी-पेस्ट मेसेज पाठवण्यात दंग झालाय . काहीजण तर अगदी संकुचितपने सेम टू यू असे लिहून मोकळे होतात पण यामागे भावनांचा ओलावा दिसत नाही . यापेक्षा खरंच आपले कोणी मित्र असतील तर त्याच्यासोबत वेळ घालवा ,त्यांच्याशी फोनवर गप्पा मारा आपली सुख दुःखं वाटुन घ्या यातून आपण खरा मैत्रीदिन साजरा करू शकतो.

         - अजिंक्य

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...