कालवड
नात्यातला हळुवारपणा , भावनिक गुंता , प्रेमाचे आणि वात्सल्याचे सूर घेऊन वाहत असते . गावकऱ्यांचा रांगडा बाज आणि निसर्गाच्या रंगाचा रंगलेला साज घेऊन गावपण प्रवाही होत असते . गावात एकीची उब असते आणि आधुनिकतेचा उहापोह नसतो . जीवाला जीव देण्याची नितळ भावना असते जीवाला जपून माणुसकीचे गोडवे गाणाऱ्यांची संवेदनाहीन परंपरा नसते . माणूसपण जपणाऱ्या प्रथा असतात पण रक्तरंजित घटना घडवणारी पोकळ डोकी नसतात . अर्थात याला अपवाद असतातच . अपवादांची देखील काही अंशी वेगळी मजा असते . त्यावर नंतर कधी बोलू .....
ज्या वेळी शहरात प्रचंड धांदल असते . गडबड असते . आणि जो तो आपले रुटीन उरकण्यात व्यस्त असतो तेव्हा आमच्या गावाकडं मंजुळ आवाजात लहानसे वासरू दावणीतला चारा चघळत आईची वाट बघत असते . दावणीत चारा असतो . पाणी असते पण वासरू आईची मन लावून वाट पाहत असते . त्याला आपण काहीही केले तरी वाट बघण्यापासून परावृत्त करू शकत नाही . त्या दावणीला त्याच्या आईच्या मायेची उब असते . मालकाच्या गावठी पण रांगड्या बाजाचा सुगंध असतो . गोठ्यात छान आणि गोंडस 'कालवड' असेल तर दिवसभर अगदी मंजुळ आवाजात ओरडत ती एकूणच गावपणाला संगीत देत असते आणि अनोखे सौंदर्य प्रदान करत असते .
आजच्या लेखात आपण बोलणार आहोत 'कालवड' या शब्दावर . कालवड म्हणजे गाईला झालेले मादी जातीचे वासरू . नर वासराला गोऱ्हा म्हणतात . ग्रामीण भागातले हे गोड शब्द विस्मरणात जात आहेत त्यामुळे हे शब्द आणि त्यांच्या अर्थांसहित त्यांना आठवणींबरोबर गुंफून जतन करण्याचा प्रयत्न्य माध्यमातून करत आहे . जर मुलगी झाली तर बर्फी आणि मुलगा झाला तर पेढा म्हणण्याचा प्रघात आहे . पण या वेळी दोन्ही गोडच असतात आणि आपल्या आयुष्यात तोच गोडवा आणतात . मध्यंतरी सोनोग्राफी करून स्त्री भ्रूणहत्या करण्याचे प्रकार झाले आणि या बर्फीचा गोडवा हरवला . त्याचे परिणाम आजही होत आहेत .
असो , गायीचे मादी वासरू म्हणजे कालवड आणि नर वासरू म्हणजे गोऱ्हा . जेव्हा जर्सी गायी आल्या तेव्हा मात्र या नावांमध्ये थोडा बदल झाला . याआधी गीर गायी , गावरान गायी असायच्या . म्हशींची संख्या देखील लक्षणीय होती . पण जर्सी गायीची दूध देण्याची क्षमता , उपयोगिता यामुळे या गाई सुरुवातीच्या थोड्या विरोधानंतर इकडे स्थायिक झाल्या . जर्सी गायीच्या गोऱ्ह्याला अंतुल्या म्हटले जाते . बोलीभाषेनुसार शब्द बदलतात तसे कालवडीची 'काऱ्होड' होते .तर अशी ही कालवड शब्दाची व्याप्ती आहे . जर्सी कालवडीचा दर्जा टक्केवारी अशा शब्दाने मोजला जातो ,सांगितला जातो .
जर्सी गायी देखील इकडं आल्या आणि माणसाळल्या . त्यांनी देखील गावरान गायीची जागा घेतली . गावरान गायीच्या दुधाची जागा घेण्यात मात्र त्या अपयशी ठरत आहेत . गावरान गायींची सवत म्हणजे हि जर्सी गाय . तुलनेने प्रचंड गरीब . दूध भरपूर देणार पण खायला राक्षसासारखी . कितीही टाका खातच राहते वाया घालवत नाही . जर्सी गायीविषयी वेगळ्या लेखात बोलू पण जर्सी गायीला कालवड झाली तर आनंद होतो आणि गावरान गायीला गोऱ्हा झाला तर आनंद होतो कारण जर्सी कालवडीला आणि गावरान गोऱ्ह्याला चांगली किंमत मिळते . शेतकरी राजा मात्र जीव लावून या प्राण्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत असतो . अगदी मोठ्या मनाने ...!
काल आमच्या कालवडीचा टिपलेला हा फोटो आहे . थोडीशी हडकुळी , अशक्त आहे पण हिचा आवाज मात्र गोड आहे . दुपारच्या शांत वातावरणाला हिच्या आवाजाचे संगीत म्हणजे अविस्मरणीय क्षण . हि भावनाविवश होऊन ओरडते . जशी जशी संध्याकाळ होते तशी तिच्या आवाजातली आर्तता टिपण्याजोगी असते .संध्याकाळी आईला भेटताना तिचा आनंद बघण्यासारखा असतो . ती बेभान होऊन आईच्या कुशीत जाते तेव्हा मला देखील हेवा वाटतो . मी तिचा फोटो काढला आणि व्हाट्सअँप वर पोस्ट केला आणि लिहिले आमची श्रीमंती . तिचे नाव जरी बगळी असले तरी हे जीवन आमची श्रीमंती आहे . गावपण हि श्रीमंती कधीही कुणाला लुटता येणार नाही . अक्षय आनंदाचा अनमोल ठेवा म्हणजे आमचे गावपण .....
काल आमच्या कालवडीचा टिपलेला हा फोटो आहे . थोडीशी हडकुळी , अशक्त आहे पण हिचा आवाज मात्र गोड आहे . दुपारच्या शांत वातावरणाला हिच्या आवाजाचे संगीत म्हणजे अविस्मरणीय क्षण . हि भावनाविवश होऊन ओरडते . जशी जशी संध्याकाळ होते तशी तिच्या आवाजातली आर्तता टिपण्याजोगी असते .संध्याकाळी आईला भेटताना तिचा आनंद बघण्यासारखा असतो . ती बेभान होऊन आईच्या कुशीत जाते तेव्हा मला देखील हेवा वाटतो . मी तिचा फोटो काढला आणि व्हाट्सअँप वर पोस्ट केला आणि लिहिले आमची श्रीमंती . तिचे नाव जरी बगळी असले तरी हे जीवन आमची श्रीमंती आहे . गावपण हि श्रीमंती कधीही कुणाला लुटता येणार नाही . अक्षय आनंदाचा अनमोल ठेवा म्हणजे आमचे गावपण .....
Nice
ReplyDeleteMast
ReplyDelete