हा काय कोलाहल आहे ?
आज काय सुरु आहे या राष्ट्रात ?केवळ प्रश्न आणि उत्तरांची अवास्तव स्वप्ने ...प्रश्न फार सोप्पे पण उत्तरे कधी मिळालीच नाहीत ...अनेक परंपरा ,विविधता ,जात आणि धर्माच्या आपण अभेद्य बनवलेल्या कड्या ....त्यातून झालेला एखाद्या माथेफिरू धार्मिक संघटनेचा जन्म ,त्यातून त्याच धर्माची तुडवली गेलेली तत्वे आणि स्वतःला पुढारलेल्या तत्वांच्या स्वरूपात पेश करण्याची घाई ....त्यात या सगळ्या विविधतेला डावलून नव्हे तर स्वीकारून एकतेचं अमृत पिऊन स्वीकारलेल ला ( काहींनी मनाविरुद्ध) पण थेट हृदयाजवळ ठेवलेला संविधान नावाचा गुरुमंत्र ....यात अनेक प्रधानमंत्र्यांची आणि राजनेत्यांची बदललेली, कधी उजळलेली भूमिका ,त्यातून भारताची आणि पर्यायाने जनमानसाची भारतीय म्हणून उदयाला आलेली एक सोशिक अस्मिता...
झालेली अनेक आंदोलने आणि त्यातून बदललेली मानसिकता ...धर्म या अर्थपूर्ण शब्दाचा किंवा भावनेचा बदलेला अर्थ ,त्याची बदलेली व्याख्या आणि त्या शब्दामागे वाढलेला अंधत्वाचा आणि आंधळ्यांचा रेटा ,भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेला पाश्चात्यांचा हस्तक्षेप त्यातून भारतीय आधुनिकतेला लागलेलं चंगळवादी वळण ,राजकीय क्षेत्रात बोकाळलेला चंगळवाद आणि बिघडलेले स्वयंघोषित नेते ,त्यातून त्यांना मिळालेला धार्मिक शक्तींचा (तथाकथित ) आधार .....समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत कासोशीच्या प्रयत्नांतून उभी केलेली आंदोलने त्यातून होणारी हानी आणि मानवी मनांची पाशवी पिळवणूक ,आंदोलनांचे बदलणारे संदर्भ आणि आकड्यांमध्ये होणारी मानवसमूहांची गिनती ....मनचक्षुंच्या पटलावर उमटलेली आंदोलनांची आणि त्यांच्या हेतूंची काळी प्रतिमा ,अक्षम नेतृत्वाची मांदीआळी आणि सक्षम नेतृत्वांना ओळखण्यात आलेलं अपयश किंवा पैश्याच्या माऱ्यामध्ये लुटली गेलेली भाबडी मने .....
प्रत्येक गोष्टीत हवा असलेला बदल पण हरवलेली दिशा ,बदल आणि बदलांची दिशा देणाऱ्यांची बेसुमार कत्तल ,त्यातून राष्ट्रगाड्यासाठी कमी पडणारा ऑक्सिजन आणि राष्ट्र म्हणून प्रसिध्द असलेल्या भारताचा अडखळलेला आणि गुदमरलेला श्वास ,त्यातून माझ्यासारख्या एखाद्या राष्ट्रभक्ताची या उत्तरांसाठी सुरु असलेली दडपलेली धडपड आणि फक्त धडपड ....व्यर्थ पण अर्थपूर्ण धडपड ....दुर्लक्षित तरीही लक्षवेधी धडपड ....आणि त्या धडपडीतून बनणाऱ्या आणि निखाऱ्यासारख्या तळपणाऱ्या ठिणग्या ..केवळ काही वेळ जळणाऱ्या आणि लगेच दडपल्या जाणाऱ्या एखाद्या तथाकथिक आणि स्वयंघोषित नेत्याच्या आश्वासनासारख्या ...
मरण स्वस्त आहे आणि मरणाला हमीभाव मिळवण्याची बेभरवशाची लढाई...लढाईतून सांडणारे स्वस्त रक्त वाहत वाहत जाते कोण्या पुढाऱ्यांच्या घरात आणि मोठ्या किमतीने विकायला निघते वाजत गाजत ...विकलेली बुद्धी आणि बांधलेले हात घेऊन भविष्याची स्वप्न रंगवत चिरनिद्रा घेणारी अक्कलशुन्य पिढी परीक्षेसाठी अभ्यास करताना बिनप्रश्नांची उत्तरे कशी शोधणार ?....उत्तर मिळाले आणि ते मांडले की कत्तल होते ,भांडले की दाबले जाते मग मूग गिळून मरणयातना भोगताना झुंडीचे जथेच्या जथे कत्तलीचा सराव करायला जाताना बघितले की स्वस्त रक्त पुन्हा मूठ आवळण्यासाठी स्नायूंना विचार देते पण हात भुकेच्या उंबऱ्याखाली अडकलेला असतो ....
-अजिंक्य
Nice👌👌
ReplyDeleteVery Nice Ajinkya,Heart touching
ReplyDeleteRealistic writing
ReplyDeleteNice
Awesome,,,,,nice ajinkya ❤️👌👌
ReplyDelete