भारी
, भन्नाट शब्द आज आपण शिकणार आहोत . आता पाणतास शब्द ज्यांना माहित आहे
त्यांच्या मनाला थोडासा गारवा जाणवला असेल . गारव्याचे कारण असे कि पाणतास
म्हणजे शेतातलं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी खोदण्यात आलेला चर . गावाकडे
तास म्हणजे अजून एक वेगळा अर्थ आहे . शेतात बैलांच्या सहाय्याने काम
करताना एका बाजूने नांगरत , पेरत , पाळी घालत किंवा कोळपत जाताना जेवढी
जमीन उकरली जाते त्या सरळ पट्ट्याला तास म्हणतात . म्हणून पाणी + तास = पाणतास (पाणी काढून देण्यासाठीचा तास ) असा शब्द तयार झाला . या पाणतासाच्या जवळ जाणारा 'पाणंद' असा अजून एक शब्द आहे पण त्यावर आपण नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलू .
पाणतासाचा
आणि आमचा संबंध शक्यतो उन्हाळ्यात यायचा . एरवी पाणतास हि प्रचंड अडचणीची ,
अनेक झाडाझुडपांनी आणि वेलींनी आच्छादलेली त्यामुळे तिकडे जाण्याची
कुणाची हिम्मत नसते . सर्व झाडांची एकत्रित वाढण्याची स्पर्धा असते . यात
मात्र कावळीचा , गुळवेलाचा , नागिणीचा , असे अनेक वेल असतात . या गर्दीत
गम्मत अशी होते कि या वेली सर्वांवर बाजी मारतात . झाडांवर ओढणी पांघरून
घालावी तशी झालर टाकतात . पावसाळ्यात या वेलींना विविध रंगी फुले येतात .
त्यांचे त्या मोठ्या झाडांवरचे आच्छादन म्हणजे नव्या नवरीने डोक्यावरून
घेतलेला पदरच !! असो
पानतासात अशा गमतीजमती होत असतात . पाणतासात शेर , आपटा , बेशरम , चिंच ,
खैर , आरखडी , सौंदडी , रुई , कधीकधी वड - पिंपळ , लिंब , उंबर , येडी
बाभळ असे अनगिनत झाडे असतात . यातील एक महत्वाची वनस्पती बाकी आहे ती
म्हणजे बोर . मी तिला पानतासाची राणी म्हणतो ! त्याचे कारण असे कि पाणतासात
जो जातो त्याची बोराटीच्या काट्यांकडून चांगली विचारपूर होते . हि बोराटी
चांगली राखण करते .
या
पाणतासात पावसाळ्यात गवत वाढते . त्यात देखील पवना , शिपरुट , खारुटी ,
कुसळी अशा गवंतांसोबत झिंजुरडं , चिकटा , लांडगा अशी झुडपे असतात . यात
अजून एक महत्वाचा सैनिक असतो त्याचे नाव आघाडा ! याला सैनिक म्हणायचे कारण
असे कि आपण पाणतासात एंट्री मारली कि एका वेळी शेकडो चाकू फेकून मारावे तसे
आघाड्याचे काटे कपड्यात घुसतात , अडकून बसतात . हे काटे जास्त टोचत नाहीत
पण आग मात्र मरणाची होते ! एकंदरीत पाणतासाच्या राज्यात जाणे म्हणजे
सोप्पी गोष्ट नाही . या सगळ्या गवत आणि झाडींसोबत आता आता काँग्रेस
(गाजरगवत ) हे गवत माजले आणि पानतासांचे सौंदर्य हरवले . पानतासात साप , घोरपड , खेकडे , मधमाशा , गांधीलमाशा , फुलपाखरे , ससे , उंदीर , घूस ,
विविध छोटेमोठे कीटक असे सगळे जीव निवांत वास्तव्याला असतात . भरपूर पाणी ,
गर्द झाडी , ऊन वारा आणि पावसापासून निवारा अशा अनुकूल वातावरणात इथे हे
जीव रमतात . पाणतास हि एक
नवी परिसंस्था आहे . खारुताई हि मात्र एकदम निवांत इथे वावरते . उंबरं ,
वडापिंपळाची फळं , बोरं , चंदनाची काळी फळं , चिंचा , आंबे , जांभळं ,
पेरू अशी फळं खात हे जीव गुण्यागोविंदाने राहतात . लपायला जागा आणि कमी
मानवी हस्तक्षेप यामुळे पाणतास त्यांना हक्काची जागा असते . हि फळं फुलं
अनुभवत या प्राण्यांच्या राज्यात जाणे मी नेहमी पसंत करतो .
साधारण
दिवाळीच्या आसपास हा पाणतास निम्मा वाळून त्यात कुसळांचं साम्राज्य येतं.
हे कपड्यावर नेमकं कुठं घुसलंय हे शोधणं महाकठीण काम. सापडत तर नाहीच पण
झोपल्यावर मात्र डॉक्टरच्या सुईपेक्षा जास्त टोचनार. त्यासाठी अंगणात
बसलेली म्हातारी या कुसळांच्या शोधात स्पेशल incharge दिलेला ऑफिसरच !!
जनावरांच्या गोठ्यापासून कोंबडीचे खुराडे तयार करण्यापर्यंत निर्गुडीच्या
बंधाट्या, कुर्हाड,टिकाव, खोऱ्याचा योग्य त्या मापाचा दांडा पाणतासच पुरवत
आलेला. आजीबाईच्या बटव्यातील जेवढी औषधी वनस्पतींची नावं असतील ती सर्व
पाणतासात भेटून जायची. मग त्यात कुर्मुडी, कांगुनी, सतापा, ढाका (तीनही
छोट्या गवतवजा औषधी वनस्पती) यासोबतच गुळवेल, जनावरांच्या जुलाबावर गुणकारी
शिसमचा , हगवणीचा पाला असेल किंवा जखमेवर बांधायला लागणारा डीडवणीचा पाला
पाणतासातच भेटायचं.
'
पांतासापांतासानी काय फिरू राह्यला ए रताळ्या ...डसल ना एखादा काका मामा
... ' अशी नऊवारीतील आजी वरडत असती आणि पोरं मात्र बोरी आणि मव्हाळं (
मोहळ ) काढण्यात गुंग . तिच्यायला शेराचं मव्हाळ असू , चिंचचं असू ,
एरंडाचं असू नाहीतर बेसरामाचं हि पोऱ्हं तीधं तरफडणार , मद खाणार , चांगला
कोपरापत्तुर वघळ येउस्तवर !! खेकडे धरणार , मासं धरणार एकंदरीत मजा आणि
फक्त मजा !!
पाणतासाचे अस्तित्व ओढ्यापर्यंत असते
. पूर्वी सर्रास पानतास होते पण जशी जमीन कमी होत गेली तसे बांध छोटे
झाले , पानतास गायब झाले . पानतास उन्हाळ्यात जवळचे वाटते त्याचे कारण असे
कि उन्हाळ्यात गुरे चारण्यासाठी आम्ही तिकडे जातो . बाकीचा सगळा चारा
वाळलेला असताना पाणतासात मात्र हिरवा चारा असतो . बाहेर ऊन असताना इथे
गारवा असतो . त्यामुळे जनावरं इथं रमतात . गाया जर जर्सी असतील तर त्यांना
ऊन सहन होत नाही त्या देखील सावलीत चरणे पसंत करतात . म्हशींना देखील असे
दलदलीची , गारव्याची जागा आवडते . गावरान जनावरे इथे दुपारी निवांत बसतात
कारण त्यांचे पोट लवकर भरते त्यांच्या घंट्या किणकिणत असतात . उन्हाळ्यात
पाणतासात भरणारा हा मेळा खूप आनंददायी असतो . संध्याकाळी मात्र हि जनावरे
पुन्हा कसन ( गवत ) खायला सुरु करतात . इथे जर आंब्याचे झाड असेल तर दुपारी
झाडाची राखण करत पडलेले पाड खात बिंधास्त झोपणे हा देखील एक वेगळाच अनुभव
.
पाणतासाचा अजून एक फायदा पाहुयात. पूर्वी शेतात पाणी पोचवायला पाट खूप लांबून आणावे लागत . पाट या विषयावर नंतर सविस्तर पाहू. आधी मोटीने आणि नंतर मोटारी आल्यानंतरही पाटांची लांबी 2 ते 3 किमी असायची. या पाटात अटीवर किती पाणी उरतं याचं गणित करणं अवघड जायचं, मोटार बंद केल्यानंतर इकडे वाफा फुटून हमखास पाणी दुसऱ्याच्या मालात जाणार हे माहित असायचं त्यामुळं, इथं पाणतास इथे महत्वाची भूमिका घ्यायचा. भरून झाल्यावर पाणतासाव बार मोडलं कि पाणतास आठवडाभरात गुरं चारायला उन्हाळ्यात पण फुलायचा. म्हणजे पाणी दुसऱ्याच्या मालात पण जाणार नाही आणि गुरांना खायला पण मिळणार !
लहानपणीच्या अनेक आठवनी या पाणतासातच पाणावतात. शनिवार, रविवारी बोरं खायला जाऊन सोबतच पूरक उद्योग म्हणजे धनुष्यबाण, तुटलेल्या सायकल च्या चाकाचा गाडा बनवणे. या सगळ्यासाठी लवचिक लाकडी साहित्य पाणतासातच भेटायचं. या बनवलेल्या धनुष्यबाने काहींचे डोळे फोडलेलं चांगलाच आठवतंय. फुलपाखरे पकडून त्यांना दोरा बांधायचा क्रूर उद्योग देखील पाणतासातच रंगीला यायचा. काहीही कळत नसेल तरी कोणतं फुलपाखरू राजा आणि कोणतं राणी हे त्याच्यावरच्या रंगीत ठिपक्यांवरून ठरवायचं, तरवडाच्या झाडाची एखादी फांदी मोडायची आणि या फुलपाखरांना जिवंत पकडायचा उद्योग चालायचा. एखादं फुलपाखरू जखमी सापडलं कि बालमनाला किवही यायची. या सगळ्या घडामोडी चालू असताना मोडलेल्या आणि ओरखडलेल्या काट्यांना मात्र कधी औषध पाण्याची गरज पडली नाही हे तितकंच खरं!
एकदा
' मव्हाळ खायची , मव्हाळ खायची ' करत आम्ही पाणतासात घुसलो . बेशरमचे जंगल
बेशरमसारखे पार करत आम्ही दलदलीतून पलीकडे गेलो . शेराच्या ताटीला असलेलं
मोहळ काढून पुन्हा कसं पळायचं याचं फुल टू प्लॅनिंग झालेलं . एक जण धुरंधर
सेनानी शेरावर चढला , मोहळ ओढून काढलं . चिकाच्या चिळकांडया उडाल्या .
माशांचे लोचकेच्या लोचके खाली पडले आणि आम्ही जे पळत सुटलो ते थेट चिंच
गाठली . डोके बांधलेले होते . मग सर्वांनी यथेच्छ मध खाल्ला . निवांत हात
पाय धुवून घरी गेलो . त्यानंतर लागलेल्या उन्हाळ्या , रात्री 8 च्या
सुमारास अंथरुणात येऊन चावलेली राणी माशी आणि डोळा बंद होईपर्यंत सुजलेला
गाल ही विशेष आठवण ! ती माशी इतक्या वेळाने इतक्या दूर येऊन फक्त मलाच का
चावली असावी ? हा प्रश्न आणि माशीची भीती यामुळे पाणतासात जाताना मी हजार
वेळा विचार करतो .
आता तुम्ही म्हणाल मोहळाचा विषय संपला . पण नाही . आम्ही
शेराचं मोहळ काढलं होतं . तो मध देखील चांगला नव्हता .नंतर शेर असा काही
उतला बापरे बाप ! अरे कातडी फाडून काढावी वाटायची ! अख्ख अंग लाल झालं .
बारीक पुरळ आले . उन्हाळ्या लागलेल्या त्यात सुजलेला गाल एकंदरीत माझा पार
म्हसोबा झाला होता . शेराचा चीक उततो हा शोध आम्हाला नव्याने लागला . ती
खाज इतकी भयंकर होती की मुसक्याने खाजवलं तरी थांबायची नाही ! त्यानंतर
बिब्बा देखील एकदा उतला होता पण शेराची खाज जरा जास्तच !
एकंदरीत मस्तीत जगण्याची खाज कायम राहिली . पाणताशीने खूप आठवणी दिल्या सगळ्या इथे सांगता येत नाहीत पण पाणतासाच्या अनुषंगाने आलेल्या काही इथे वरती उल्लेखिल्या . पुन्हा भेटू पुढच्या लेखात गावपण या सदरात .
-अजिंक्य
एकंदरीत मस्तीत जगण्याची खाज कायम राहिली . पाणताशीने खूप आठवणी दिल्या सगळ्या इथे सांगता येत नाहीत पण पाणतासाच्या अनुषंगाने आलेल्या काही इथे वरती उल्लेखिल्या . पुन्हा भेटू पुढच्या लेखात गावपण या सदरात .
-अजिंक्य
👌👌👌👌😳😳
ReplyDeleteपाणतास छानचं की आता पाणंद साठी काय येतयं त्यासाठी उताविळ आहे..
ReplyDeleteछान लेखन केलसं पाणतास वरती
शिपरूट चा फोटो मिळेल का?
ReplyDeleteएकत्रित जमीनीतुन पानतास सोडन्याचे काही नियमावली आहे का?
ReplyDeleteमाहिती मिळाल्यास कळवा
Delete