Skip to main content

प्रासंगिक 7 :माऊली सभागृहातला एकच प्याला रंगला !


तुडुंब भरलेले माऊली सभागृह , अत्तराचा सुगंध आणि जाणत्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा राम गणेश गडकरींच्या एकच प्याला चा प्रयोग . ऐन दिवाळीच्या मंगलमय प्रभाती हा अलभ्य लाभ मला मिळाला . माझ्या मराठीची गोडी एवढी अवीट का आहे हे कळले . टाळ्या आणि मोकळ्या मनाने दिलेली दाद हेच लक्षात राहील .

संगीत नाटकं दुर्मिळ होत गेली . किंबहुना नगरकर रसिक प्रेक्षकांना संगीत नाटकं नगरमध्ये क्वचितच ऐकायला मिळाली .  नाटक संपल्यानंतर मी असे नाटक पहिल्यांदा बघत आहे असे म्हणणारे खूप प्रेक्षक भेटले . एकंदरीत संगीत , अभिनय , कला , भाषा , संस्कृती या सर्वांचा एकत्रित मेळ घालून बनलेले आणि सादर झालेले हे नाटक नगरच्या इतिहासात अजरामर होईल .

धनश्री खरवंडीकरांनी साकारलेली सिंधू मात्र सर्वांच्या लक्षात राहिली . दारुड्या नवरा असूनही पतिव्रता म्हणून तिने प्राणांतिक संभाळलेला संसार डोळे ओले करून गेला . अनिकेत देऊळगावकर देखील प्रेक्षकांना सुधाकर होऊन भेटला आणि व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होईल हे ओरडून सांगत राहिला .नाटकातला तळीराम विसरणे केवळ अशक्यच .

लक्ष्मिशी सारीपाट खेळणारे तुमचे कुल आणि तुमच्यावर काय वेळ आली ? धनसंपन्नाची कन्या आणि ज्ञानसंपन्नाची पत्नी असून केवळ दारूमुळे सिंधूचे आयुष्य उध्वस्त होते . स्वतःच्या बाळाचा मृत्यू होतो .
'साताजन्माच्या पुण्यवंताने तुझ्या पायाचे तीर्थ घ्यावे ' , ' तू आजानतेपणे जात्यात मोती भरडले असते तरी कुणाला काही वाटले नसते ', 'गत पातकांचे मूर्तिमंत पिशाच्च माझा पिच्छा सोडत नाहीत ' , 'दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची माझी इच्छा नाही ' अशी जड वाक्ये पण  अभिनयाच्या या जादूमुळे या हृदयीचे त्या हृदयी पोचले , रुजले , सजले !

जेव्हा सुधाकर दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो तेव्हा आनंदाने सिंधू नाट्यपद म्हणते .

'प्रभू आजी गमला मनी तोषला
कोपे बहू माझा तो प्रभू राजा
आता हसला मनी तोषला '


हे पद आणि धनश्री खरवंडीकरांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून गेली . टाळ्या टाळ्या आणि केवळ टाळ्या अख्ख्या सभागृहात भरून राहिल्या ! प्रकाश कुलकर्णी यांनी साकारलेल्या दोन्ही भूमिका जिवंत वाटल्या , भावल्या .
अनेक नाट्यपदं सादर झाली .तबला आणि ऑर्गनवर फिरणारी, आदळणारी बोटं देखील जादूमय होती . एकंदरीत एखाद्या जादुई सफरीवर जावं तसाच काहीसा हा अनुभव होता .

'स्वस्थ कसा तू उठ गड्या
झणी टाक उड्या
नकळे का वर्षे घन सुधेचा बाळा '

 या पदाने अंगात शिरशिरी आणली .
अप्रतिम प्रयोग झाल्यामुळे ही दिवाळी पहाट लाखळखून निघाली . सभागृहात विनंती केल्यानंतर देखील वाजणारे फोन आणि त्यावर बिनदिक्कत बोलणारे प्रेक्षक होते . मधेच उठणे , दरवाजे उघडून बाहेर जाणे येणे , वेळ न पाळणे या सर्वांना बाजूला सारत कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले . नाट्य पदांना वन्स मिळणारे मी पाहिलेले हे पहिले नाटक होते . सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन ! मराठी मातीला साष्टांग दंडवत!
दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
-अजिंक्य

Comments

  1. मस्त लिहिलंय भाई.. नाटकाला येऊ शकलो नाही, पण या लिखाणातून सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.. सभागृहात बसल्यासारखा फील आला.. हे नाटक पाहण्याचा योग आता पुन्हा कधी येईल कोण जाणे.. जादुई सफरीचा अनुभव मिस केला..

    ReplyDelete
    Replies
    1. मिळेल सर , माणसाने आशावादी असावं .

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...