Skip to main content

गावपण भाग 8 : वाढं , मोळी आणि भेळा

जुने शब्द माहीत करून घेण्याचा सिलसिला असाच सुरू राहील.जुन्या संस्कृती वर माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे . या लेखांच्या माध्यमातून मलाही जुन्या आठवणी पुन्हा जगायला मिळतात .

ज्यांनी ऊसतोड पहिली आहे त्यांच्यासाठी हे शब्द नवे नाहीत . साखर कारखान्यांमध्ये होणारे घोटाळे , शेतकऱ्यांची लूटमार , काटामारीची बिमारी ,  दिवस दिवस ताटकळत बसलेले शेतकरी  , ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याचा , शिक्षणाचा , जीविताचा प्रश्न हे सगळे विषय बाजूला ठेऊन इथे फक्त त्या शब्दांना न्याय देऊ ...

ज्याची वाढ होते ते वाढे . वाढे हा ऊसाचा वाढणारा शेंडा असतो . जिथे ऊसाच्या कांड्या संपतात आणि कोवळा हिरवा भाग सुरू होतो तिथून ऊस आणि वाढे वेगळे केले जाते . कोयत्याने तोडणारा ऊस आणि वाढे वेगळे करतो . आता हे वाढे जनावरांना खाण्यासाठी नेले जाते . या वाढयावरची मालकी ऊस तोडणी कामगारांची असते . त्यामुळे वाढयातून मिळणारे पैसे हा त्यांचा बोनसच असतो .

अशा वाढयांना एकत्र करून त्यांची पेंडी बांधली जाते . त्याला भेळा म्हणतात . पूर्वी एका भेळ्यात दहाच्या आसपास वाढे असायचे  . त्याची किंमत साधारण 100 ते 200 रुपये शेकड्याच्या आसपास असायची . आत्ताचे ऊसावले जरा हुशार आहेत . ते 20 वाढयांचा भेळा बांधतात आणि 400 रुपये शेकडा सांगत आहेत . मी आजच एक शेकडा घेतला . नंतर बाकीच्यांना वाढे मिळाले नाहीत . दुष्काळ असल्याने वाढयांना खूप मागणी आहे . 100 भेळे मला दोन दिवस जातील .


वाढयापासून वेगळा केलेला ऊस त्याच वाढयाने बांधला जातो . त्याला मोळी म्हणतात . मोळी हा शब्द सर्वांना माहीत आहे . त्यामुळे त्याचा जास्त विस्तार करत नाही . ऊसतोडणी कामगारांची छोटी छोटी मुले दिवसभर अर्धनग्न अवस्थेत त्या गचपणात फिरत असतात . खेळत असतात . फ्लॅटमध्ये ऐटीत असलेल्या आपल्या मुलांसारखे रडलेले मी त्यांना कधीच पाहिलेलं नाही .

असो गायींना ऊस जसाच्या तसा खाता येत नाही . चावता येत नाही त्यामुळे त्याचे साधारण 4 ते पाच इंच लांबीचे तुकडे केले जातात त्याला आमच्याकडे 'बीट्ट्या' किंवा 'गंडया' म्हणतात . हे एकतर कुट्टी मशीनने केले जाते किंवा अडकित्याने केले जाते . वेळप्रसंगी आम्ही कुऱ्हाड , कोयता किंवा विळा वापरतो .

मी सहाविला असेल तेव्हाची गोष्ट . आमच्या पाणंदीने एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता . मी आणि माझी एक बहीण घरी येत असताना त्या ट्रॅक्टरमधून दोन उसाच्या मोठया मोळ्या खाली पडल्या . हळूहळू डुलत डुलत तो ट्रॅक्टर निघून गेला . नंतर त्या दोन मोळ्या घरी आणताना आमची झालेली तारांबळ लक्षात आहे . त्यानंतर त्यातला ऊस खाल्ल्यानंतर दोन दिवस साधी भाजीदेखील  इतकी तिखट लागायची की ज्याचं नाव ते !
असो उसाच्या रसामुळे खूप ताकद येते असे आमचे निळूकाका सांगतात . त्यामुळे जर कधी ऊस खाण्याची संधी आली तर ती मी सोडत नाही ! तोंडाची पर्वा करत नाही!
- अजिंक्य


Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...