Skip to main content

प्रासंगिक भाग 4


गोडवा भारतीय सणांचा :वटपौर्णिमा

भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात . अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो . असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते . वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात . या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात ,हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात . भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा !
         जिथे श्रद्धेचा अतिरेक होतो तिथे अंधश्रद्धेचा उगम झालाच म्हणून समजा . मूळ उद्देशापासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा मात्र अंधश्रद्धेकडे झुकण्याचा धोका जास्त असतो . वटपौर्णिमा देखील अनेक अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडली आहे . या चुकीच्या समजुती दूर सारून जर मूळ उद्देश समजावून घेतला तर हे सण आपल्या आयुष्यातील सुंदर काळ असतील . या सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात . तिथे हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात आणि हातातला दोरा गुंडाळून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात . आंबे वाहतात . खेड्यात वडाच्या झाडाला वाहिलेले आंबे खाण्यासाठी बाल सवंगड्यांची मोठी फौज जमलेली असते . पावसाळ्याचे दिवस ,सरीवर सर कोसळणारे आल्हाददायक वातावरण आणि कमालीचा गारवा अशा स्वर्गीय वातावरणात ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो .
        वडाचे झाड सदाहरित असून प्रचंड मोठे होत जाते . त्याचा विस्तार वाढत जातो करण त्याच्या पारंब्या जमिनीला टेकतात, तिथेच रुजतात आणि त्याचे मोठे खोड तयार होते . क्रमाक्रमाने झाडाचा विस्तार वाढत जातो . रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे ही गावाची शान असते . या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे म्हणूनच दीर्घायुष्य प्रदान करणारा असा हा वृक्ष आहे . आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी वडाच्याच झाडाची पूजा का करावी या प्रश्नाचे भावनिक उत्तर इथे मिळते .
‌ वडाच्या पानांचा काढा लघवीवरील विकारांमध्ये उपयुक्त असतो . वडाच्या सालीचा काढा स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासापासून मुकतो देऊ शकतो .वडाच्या पारंब्यांपासून पानातल्या चिकापर्यंत प्रत्येक घटक औषधी आहे . पारंब्याचे तेल वापरले तर त्या पारंब्यांसारखे केस वाढतात असं थोर मोठे सांगतात . वडाच्या झाडाभोवतालचे वातावरण प्रसन्न असते . जीवन जगण्यासाठी लागणारी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते . कदाचित याच कारणाने वटवृक्षाच्या पूजेची प्रथा पडली असावी .



‌संध्याकाळी महिला सत्यवान सावित्रीची पूजा करत पुढील प्रार्थना म्हणतात .

‌सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
विस्तारत जाणाऱ्या वडाच्या झाडाप्रमाने वंश वाढावा .पती मुले आणि एकूणच कुटुंबाला आयु आणि आरोग्य लाभावे . कुटुंबाची भरभराट व्हावी आणि सगळी सुखे मिळावीत अशी प्रार्थना भगिनी करते . एकूणच आपल्या पतीशी प्रामाणिक राहून पुढील मार्गक्रमण करण्याची अत्यंत सुंदर गोष्ट ती व्यक्त करते . या सणाच्या निमित्ताने नात्यातला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि यातूनच कुटुंबव्यवस्थेचा पाया उभा राहतो . भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेली ही व्यवस्था एकमेकांना पूरक आहे .  आजच्या स्वैराचार पसरलेल्या जमान्यात एकमेकांना विश्वासाने समजावून घेत प्रपंचगाडा हाकण्यासाठी ते सज्ज होतात . आजच्या तरुण तरूणींसाठी ही खरच मार्गदर्शक गोष्ट आहे  .

‌आजकाल घरात एखादे वडाचे चित्र आणून त्याची पूजा केली जाते . वडाच्या फांदीची पूजा केली जाते पण यातून काहीही साध्य होत नाही . असे करून आपण वडाच्या झाडाला इजा पोचवत आहोत हे लक्षात ठेवा . वडाची आणि एकूणच सर्व वृक्षांची वृद्धी व्हावी ,हे पर्यावरण पुन्हा बहरावे अशा व्यापक दृष्टिकोनातून वटपौर्णिमा साजरी व्हायला हवी .घरात बसून निसर्ग तुम्हाला काय कळणार ? त्यासाठी निसर्गात निसर्गाचे बनून जावे लागते . निसर्गातल्या प्रत्येक हालचालीवर चिकित्सक मनाने नजर ठेवावी लागते आणि यातूनच आजूबाजूच्या पर्यावरणावर प्रेम जडते . अगदी उत्क्रांतीच्या काळात महिलांनी शेतीची संकल्पना मांडली असावी असा तर्क लावला जातो . त्यांचे हे विशेष निसर्गप्रेम लक्षात घेऊन या सणाची अशी रचना केली असावी .


‌स्वतःच्या आयुष्यासाठी आणि एकूणच दीर्घ आयुष्याची मागणी करताना एकूणच संपूर्ण पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेऊ . एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून सण आणि उत्सवांकडून बघूया .


‌अजिंक्य दंडवते ,देवदैठण ,तालुका श्रीगोंदा ,जिल्हा अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...